आकापुर शेतशिवातील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगांव तालुक्यातील आकापुर येथील शेतशिवारात विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २२ एप्रिल २०२४ रोज सोमवारला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
तालुक्यात मागील काही दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती अशातच आज तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.वादळवारा आणि गारांसहित पावसाला सुरुवात झाली.अचानक सुरु झालेल्या गारपीटमुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ सुरु झाली.गावातली अनेकांचे पशुधन उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतामध्ये मोकाट किंवा शेतातील बंड्यामध्येच बांधले जातात.अशातच आज अचानक दुपारी आकाशात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरु झाला व सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारा पावसाने दमदार हजेरी लावली.

आकापूर येथील नारायण पुंडलिक खंडाळकर यांचे कडे ५ एकर शेती लाखापुर शिवारात आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याचे बैल ते राहत असलेल्या आकापूर गावातील शेतीवरच चरण्यासाठी गेले होते. ह्या शेतकऱ्याच्या एका बैलावर शेतशिवारात विज कोसळून बैल जागीच ठार झाला.शेतीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे अंदाजे ५५ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता.