फुलोऱ्यावर आलेली कपाशीची झाडे उपटल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान.
हटवांजरी प्रतिनिधि:- रुपेश बोधाने
ऐन फुलोऱ्यात आलेली कपाशीची झाडे सरफिरूने उपटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन शेती हंगामाच्या मध्यात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. विकृत मानसिकतेतून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी किसन जानबा घोडाम यांचे कडे सुमारे 7 एकर शेती आहे. त्यांची शेती हटवांजरी ते बुरांडा रस्त्याच्या कडेला आहे. त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली होती. काल दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला नेहमी प्रमाणे ते शेतीची कामे आटोपून घरी गेले होते. आणि आज दिनांक 24 ऑगस्टला 2022 रोज बुधवारला सकाळी ते शेतामध्ये आले.
त्यावेळी त्यांना शेतातील सुमारे एक एकर शेतामधील कपाशीची झाडे उपटलेली दिसली. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. शेतीच्या ऐन बहाराच्या हंगामात शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.यावर्षी सुरुवातीला पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार – तिबर पेरणी करावी लागली होती.
त्या नंतर जुलै महिन्यात एवढा पाऊस पडला की, शेतकऱ्यांच्या शेतात सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. आणि त्यात शेतीचे असे अज्ञात सरफिरूने केलेले नुकसान पाहून शेतकरी मायबाप आता जगायचे कसे असा टाहो फोडतांना दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.