एम.आय.डी.सी.दाखवतेय वाकुल्या
आदिवासी बहुल तालुका असून रोजगारासाठी कुठलेही उपाय योजना नाही
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यात 57 ग्रामपंचायत असुन 105 गावांचा समावेश आहे.तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुल तालुका म्हणुन आहे. त्या दृष्टीने आज पर्यंत तालुक्यातील युवक व युवतीसाठी रोजगाराची तीळमात्र उपाययोजना लोकप्रतिनिधि किंवा प्रशासनाकडून कऱण्यात आली नाही ही शोकांकिता आहे.येथे असलेली एम.आय.डी.सी.ही बेरोजगार युवकांना वाकुल्या दाखवल्यासारखी भासत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी निव्वळ निवडणुकीच्या
वेळी तालुक्यासाठी हे करू, ते करू असे पोकळ आश्वासने देऊन आपला पाणगा शिजवून निघून गेल्याचा इतिहास आहे.पण आजपर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यासाठी व तालुक्यातील युवक युवतींसाठी रोजगारा संदर्भात कंपनी किंवा उद्योगाची साधने तालुक्यात उपलब्ध करणे गरजेचे समजले नाही.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर बुडाई याने शेतकरी मेटीकुटीस आला आहे.आणि सुशिक्षित बेरोजगार मुले प्रत्येक गावात रोजगारासाठी भटकंती करताना दिसत आहे. पण त्यांना रोजगार तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.मात्र या कडे कोणत्याही नेते किंवा पुढाऱ्याचे लक्ष वेधले नाही ही शोकांकीता आहे.त्या मुळे तालुक्यांतील युवक वर्ग लोकप्रतिनिधी व प्रशासना संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
======================== मारेगाव तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एम.आय.डी.सी.झालेली आहे.परंतु एम.आय. डी.सी.झाल्यानंतर येथील युवकांना व्यवसायासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळेल.तसेच बेरोजगार युवकांना वाकूल्या दाखवणारा मारेगाव शहरा पासुन अंदाजे एक किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या अंदाजे 30 वर्षा पासून लागला आहे.
मात्र लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे अजून पर्यंत तिथे औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.त्यामुळे एम.आय.डी.सी.चे नेमके काय झाले? व एमआयडीसी अंतर्गत औद्योगीक समस्या निकाली काढण्यासंबंधाचे कुठे घोडे अडले?हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.
याचबरोबर मारेगाव तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत.खासदार व आमदार सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीनीही बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील दिसून येत नाही.मग या एमआयडीसी फलकाचे दर्शन दररोज कशासाठी?हा मुद्दा महत्वपूर्ण आहे.