मारेगाव येथील पत्रकार परिषदेत राजू उंबरकर यांनी केली घोषणा
सुरेश पाचभाई मारेगाव,
शेतकऱ्यांसमोर सध्या विविध समस्या आहे. त्या सुटण्याचे नाव घेत नाही. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्या प्रश्नाची साधी दखलही घेत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दिला.ते मारेगाव येथील विश्रामगृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मारेगाव तालुक्यात विजेचा मोठया प्रमाणावर लपंडाव सुरु आहे. शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी पेरणीही केलेली आहे.पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अशातच शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे.पण काहींचे विजेचे कनेक्शन कापलेले आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहे. काही ठिकाणी तार तुटलेले आहे. या व अशा अनेक समस्यांमुळे आणि वीज प्रवाह बंद असल्यामुळे शेतकरी ओलीत करू शकत नाही.
वनोजादेवी येथील प्रस्तावित नवीन उपकेंद्र अजूनही धुळखात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे तर पदाधिकारी मूग गिळून गप्प आहे. तालुक्यातील किती पांदन रस्त्याचे प्रस्ताव शासन दरबारी गेले हे कोणालाही माहिती नाही.तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे.चढया भावाने बियाण्यांची विक्री सुरु आहे. लिंकिंगच्या नावाखाली बोगस बियाणे देणे, खतसोबतही लिंकिंग असल्यामुळे शेतकऱ्यांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.
सरकार आणि नेते मंडळी डोळे लावून याकडे पाहत आहे. मनसे मात्र गप्प बसणार नसून जोडे मारो आंदोलन किंवा न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सर्वकाही करण्यात येईल असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला.यावेळी संतोष रोगे,रुपेश ढोके,धनंजय त्रिंबके,नबी शेख,उज्वला चंदनखेडे,उदय खीरटकर, किशोर मानकर, शुभम भोयर, जम्मू खान उपस्थित होते.