मुक्ता शेतशिवारातील घटना : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील मुक्ता शेतशिवारात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात दोन गाई ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी श्यामसुंदर कृष्णाजी ढवस यांच्या गाई चराईवरून परतत असताना शेतातच वाघाने अचानक हल्ला केला. यात दोन्ही गाईंचा जागीच मृत्यू झाला. मृत गाईंची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. रात्रीच्या वेळी शेतशिवारात जाणे धोकादायक झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच कुणाल सावरकर वनरक्षक मार्डी , अक्षय सराटे वनसेवक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पीडित शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.