चावडी कडे लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा नारायण गोडे यांचा आरोप
सुरेश पाचभाई मारेगाव,
बुरांडा (ख) येथील चावडी ही अजीर्ण अवस्थेत असून धोकादायक बनलेली आहे.या चावडीवरील सागाचे फाटे आणि कवेलू फुटून खाली पडलेले आहे. या चावडीमुळे कदाचित जीवितहानी होण्याची शक्यता असून याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी केला आहे.
मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. येथे मागील अनेक वर्षापूर्वी चावडीचे बांधकाम करण्यात आले होते. पण आज ते पूर्णपणे अजीर्ण झाले आहे. त्याच्यावर टाकलेले सागाचे फाटे आणि कवेलू तुटून खाली पडून फुटले आहे.या ठिकाणी अनेक नेते मंडळी फक्त मतदानाच्या वेळेस मत मागायला याच ठिकाणी येतात.याच चावडीसमोर बसतात आणि मी निवडून आलो तर चावडी बांधीन असे पोकळ आश्वासन देतात.
तरीही मागील अनेक वर्षापासून चावडीची अवस्था जशीच्या तशीच आहे. बुरांडा (ख) येथे कोलाम समाज बांधवांची 60 घर आहे.विशेष म्हणजे गेल्या 45 वर्षापासून समाज बांधवांना मूर्ख बनवण्याचे काम आज पर्यंत च्या लोकप्रतिनिधींनी केले आहे,असा आरोप नारायण गोडे यांनी काल दिनांक 30 जानेवारी 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 9 वाजता च्या सुमारास घेतलेल्या मीटिंगमध्ये केला.
या वेळी सभेला बुरांडा खडकी येथील सरपंच रंगुबाई दादाराव आत्राम यांचे उपस्थितीत ही मीटिंग घेण्यात आली होती. गावातील अनेक युवक,महीला,पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.