तालुक्यातील गोरज येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
शेतामधून घरी परतत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोरज येथे घडली.ही घटना आज दि. 30 ऑगस्टला दुपारी 3.20 च्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निर्मला श्रीकृष्ण आत्राम वय 35 असे आहे.
गोरज येथील श्रीकृष्ण आत्राम हे भूमीहीन आहेत.त्यांच्याकडे शेती नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी दोन ते तीन एकर शेती ठेक्याने केलेली होती.त्यांची पत्नी शेतामध्ये निंदन करण्यासाठी गेली होती. शेतामधून घरी परतत असताना गावाजवळ असलेल्या मोहन काळे यांच्या शेताजवळ आली असता तिच्या अंगावर वीज पडली.

वीज पडली त्यावेळेस महिलेच्या समोर चंद्रभान मडावी यांची बैलबंडी तर मागे विनोद कुरेकर आणि गजानन मडावी होते.इतर कोणालाही धक्का न लागता हे वीज फक्त या महिलेच्या अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.वृत्त लीहीपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून महिलेला उत्तरिय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले होते.महिलेच्या पश्चात सासू-सासरे,पती आणि दोन मुले तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.