घरकुल लाभार्थ्यांसोबतच खाजगी घर बांधकाम करणाऱ्यांनी करायचे तरी काय?
सुरेश पाचभाई मारेगाव
शासन रेती खुली करत नाही आणि प्रशासन आहे ती रेती आणू देत नाही अशी बिकट अवस्था घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांची झालेली आहे.यातच घरकुल ज्या लाभार्थ्यांना मिळाले त्यांची तर याहूनही बिकट अवस्था झालेली आहे. रेती अभावी त्यांचे घरकुल अर्ध्यावर असल्याने पावसाळ्यात आता राहायचे कुठे? असा यक्षप्रश्न या घरकुल लाभार्थ्यांसमोर पडलेला आहे.
शासनाने मोठा गाजावाजा करत घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वाटप केले. परंतु ते घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती मात्र बंद आहे.अनेक घाट हर्रास होण्याऐवजी ते तसेच पडून आहे. पर्यायाने अनेक रेती चोर त्या घाटातून रेतीसुद्धा चोरून नेत आहे. काही घाटातून तर टिप्पर भरून गेलेले आहे. परंतु ट्रॅक्टरवर मात्र धडक कारवाईचा आव आणल्या जात आहे.
शासनाने ज्यावेळी घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेती जाहीर केलेली होती त्यावेळी सुद्धा ती रेती घरकुल लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी त्या रेतीचे पास दुसरीकडे जात होते.पर्यायाने जे घरकुलधारक आहे त्यांचे घरकुल तसेच राहिले.परंतु रेती मात्र घाटातली दुसरीकडे गेल्याची चर्चा सुद्धा तालुक्यात रंगत होती.
शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वाटप केले.परंतु त्या घरकुलाच्या बांधकामासाठी लागणारी रेती मात्र बंद आहे. रेतीच नसल्याने घराचे बांधकाम झाले नाही त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहे. एकीकडे रेती उपलब्ध असून सुद्धा शासन घाट हर्रास करत नाही. आणि रेती जर दुसऱ्या मार्गाने आणतो म्हटले तर प्रशासन ती आणू देत नाही,अशी बिकट अवस्था अनेकांची झालेली आहे.
अशातच शासनाने वेगवेगळे उपक्रम राबवत घरकुलधारकांसाठी रेतीची उपलब्धता करून देण्यासाठी खटाटोप केला.परंतु रेतीमात्र उपलब्ध झाली नाही.आणि जे खाजगी घर बांधकाम करणारे आहेत त्यांच्यासाठी काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीत शासनाने रेतीचे घाट बंद ठेवून अनेकांच्या जखमेवर मीठ चोडलेले आहे.
परिसरातील काही छोटे वाहनधारक रेतीची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न करतात.परंतु स्थानिक प्रशासन मात्र त्यांच्यावर धाड टाकून त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहे. परंतु याआधी तालुक्यातून मोठ्या गाड्या भरून गेल्या त्यांच्यावर मात्र तोकडी कारवाई झाल्याचे चित्र दिसून आले आहे.