कृषी विभागाचे आवाहन
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव:- पावसाळ्याला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला वेग दिला जाणार आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी. धूळ पेरणी करणाऱ्यांना संभाव्य नुकसानीचा मोठा धोका पत्कारावा लागतो.
पेरणीदरम्यान किंवा नंतर डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होते. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फूरद ही अन्नद्रव्य आहे. त्यामुळे डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन मारेगाव कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले.
स्फूरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होते.यामध्ये स्फूरद 16 टक्क्यांसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी 3 गोणी खतांचा वापर डीएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके 10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके 12:32:16 व एनपीके 15:15:15 या खतांच्या वापरामुळे
नत्र व स्फूरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टीएसपी या खतामध्ये 46 टक्के स्फूरद अन्नद्रव्याची मात्रा आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्थी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा.