निसर्गाचे अप्रतिम रूप आणि अथांग जलाशयांचे वैभव लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ब्रेक लागला आहे. जून महिना संपत आला तरी वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी हिरवी शाल पांघरणारे डोंगर अजूनही कोरडेच आहेत. तर धबधबे वाहते झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी गजबजणाऱ्या निसर्गरम्य कडेकपारी आणि गडकिल्ले सध्या ओस पडले आहेत. नेहमी जूनच्या सुरुवातीलाच भंडारदरा, हरिश्चंद्रगड आणि मुळा धरण परिसरात निसर्गप्रेमींची अलोट गर्दी होते. मात्र, यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धुक्याची चादर आणि पांढरे शुभ्र धबधबे गायब आहेत. पाण्याचा अभाव आणि कोरड्या वातावरणामुळे अनेकांनी आपले वीकेंड प्लॅन्स रद्द केले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ट्रेकिंग आणि कॅम्पिंग बुकिंगमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका स्थानिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. पर्यटकांवर अवलंबून असणारे छोटे हॉटेल व्यावसायिक, होमस्टे मालक, स्थानिक गाईड्स आणि रानभाज्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. शनिवार-रविवारची कमाई बुडाल्याने ग्रामीण भागातील रोजगार ठप्प आहे. सध्या संपूर्ण पर्यटन क्षेत्र ‘वेटिंग मोड’वर आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यास हे चित्र बदलेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अकोले तालुका पर्यटन केंद्र जिल्ह्यात अकोले तालुक्यातील भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि अमृतेश्वर मंदिर ही मुख्य आकर्षणे आहेत. याशिवाय राहुरीचे मुळा धरण, पाथर्डीचे वृद्धेश्वर मंदिर, पारनेरचे ढोकेश्वर व सिद्धेश्वर मंदिर आणि शहरातील चाँदबीबीचा महाल ही प्रमुख स्थळे आहेत. जुलैपर्यंत वाट पहावी लागेल ^अहिल्यानगरची ओळख आता ‘पावसाळी पर्यटनाचा गड’ म्हणून होत आहे. मात्र, यंदा मान्सून लांबल्याने या अर्थचक्राला मोठा फटका बसला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यास पर्यटकांची गर्दी उसळेल, पण सध्या स्थानिक व्यावसायिकांना संयम ठेवावा लागेल. – जयंत येलूलकर, पर्यटनप्रेमी असा बसला पर्यटनाला फटका पाऊस लांबल्याने भंडारदरा परिसरातील रंधा व अंब्रेला फॉलसारखे धबधबे अजून प्रवाही झालेले नाहीत. धरणांची पातळी खालावल्याने सौंदर्य फिके पडले आहे. धुक्याची चादर नसल्याने ट्रेकर्स फिरकलेले नाहीत. यामुळे हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे रिकामे असून स्थानिक रोजगार पूर्णपणे कोलमडला आहे. भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने मुंबई, ठाणे, पुण्यातील आयटी व्यावसायिक व ट्रेकर्स येथे मोठ्या संख्येने येतात. तसेच नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटक शनिवारी, रविवारी गर्दी करतात. याशिवाय शिर्डी आणि शनी शिंगणापूरला येणारे देशभरातील भाविकही या निसर्गरम्य स्थळांना आवर्जून भेट देतात, ज्यामुळे येथील स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
