बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बंगालच्या उपसागरात वातावरणीय घडामोडींना वेग आला असून एकाच वेळी दोन हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. उपसागरात एकीकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, तर दुसरीकडे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या दुहेरी प्रभावामुळे देशभरासह महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
बंगालच्या उपसागरातील या घडामोडींमुळे मान्सूनचा प्रभाव वाढला असून देशाच्या मध्य भागासह महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत कोंकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनचा ट्रफमध्य भारतातून जात असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने सांगितली तारीख
13 ते 20 ऑगस्ट पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 60 किमी वेगानं वारे वाहणार असून त्यासोबत ढगांच्या गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. 20 ते 27 पर्यंत पुन्हा एकदा राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, या दरम्यान ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. हवामान दमट आणि उष्ण राहू शकतं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे विदर्भाकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात मोठं संकट
किनारपट्टीच्या भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगतच्या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
उत्तर भारतातही राहणार पाऊस
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि नद्यांना पूर येण्याचा धोका आहे. किनारपट्टीचा कर्नाटक, केरळ आणि माहे भागातही मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर समुद्रसपाटीपासून तब्बल ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे फिरत आहेत. पुढील २४ तासांत याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होईल.
याशिवाय, पश्चिमेकडून येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये आणि उत्तर भारतातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. ऐन पावसाळ्यात बंगालच्या उपसागरातील या हालचालींमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे.