अजित पवारांचे शवविच्छेदन सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट कशी?:नागरी उड्डाणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रोहित पवारांच्या दाव्यानुसार, 28 जानेवारी रोजी DGCA ने दुपारी 1:36 वाजता एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाद्वारे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) कंपनीला आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवल्यामुळे यंत्रणांवर दबाव निर्माण झाला. त्यामुळेच आता तपास योग्य दिशेने सुरू झाला आहे, असे पवार म्हणाले. आर्थिक संबंधामुळे कारवाई नाही रोहित पवार म्हणाले की, टीडीपीचे खासदार आणि मंत्री यांच्या नेत्याचे आणि व्हीएसआरचे आर्थिक संबंध असल्याने कुठेतरी व्हीएसआरला वाचवण्यात येत आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे की हे केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना तिथे बसण्याच अधिकार नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. घाईघाईत क्लीन चिट देण्याचा प्रयत्न अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात असताना आणि शवविच्छेदन सुरू असतानाच, डीजीसीएने आपला अहवाल सादर केला. या अहवालात व्हीएसआर कंपनीला ‘क्लीन चिट’ देण्याचा प्रयत्न झाला असून, विमानात कोणत्याही प्रकारची (Level-1) त्रुटी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, असा दावा रोहित पवारांनी केला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी 28 जानेवारी रोजी केलेल्या विधानाचा रोहित पवारांनी संदर्भ दिला. मंत्र्यांनी ‘लिएरजेट’ विमानात सुरक्षेच्या त्रुटी नसल्याचे म्हटले होते आणि वैमानिकालाही क्लीन चिट दिली होती. यावर पवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. FIR आणि आंदोलनाचा इशारा आज मुंबईत डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र तो नोंदवून घेतला जाण्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. जर गुन्हा दाखल झाला नाही, तर उद्या बारामतीमध्ये पोलिस निरीक्षकांसमोर ठिय्या मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जोपर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत तिथून हलणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा लढा केवळ त्यांचा वैयक्तिक नसून सर्वांचा आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आपापल्या भागातही गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली. व्हीएसआरच्या मालकावर कारवाई करावी रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआरच्या 5 विमानांना उड्डान करण्यास बंदी घातली आहे, पण जबाबदारी डीजीसीएची असते त्यांनी सर्व बाबी चेक करणे गरजेचे असते. व्हीएसआरने जर चूक केली असेल तर डीजीसीएसुद्धा चुकी केली असे आमचे मत आहे. व्हीएसआरच्या मालकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले पाहिजे. त्याच्यासोबतच डीजीसीएचे जे अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जे कंपनीने विमान उड्डानासाठी योग्य सांगितले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दोन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेणार काल आलेल्या DGCA च्या नवीन अहवालाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही उपस्थित केलेले मुद्देच अहवालात घेण्यात आले आहेत, मात्र तरीही काही पळवाटा शोधून केवळ मोजक्या विमानांवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भाष्य करण्यासाठी आणि पुरावे मांडण्यासाठी रोहित पवार येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार आहेत. आता अहवाल देऊन काय फायदा रोहित पवार म्हणाले की, आमचा नेता गेला आहे, आता अहवाल देऊन काय फायदा? अहवालात त्रुटी काढल्या असल्या तरी त्यातून पळवाटा शोधल्या जात आहेत. याप्रकरणी आता आम्ही गप्प बसणार नाही आणि एफआयआर दाखल करणार आहोत. रोहित पवारांची पोस्ट काय? रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय की, VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून बरेच काही समोर यायच बाकी आहे. या विषयावर सविस्तर बोलेल…गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार VSR कंपनीवर गंभीर आरोप करताना दिसले. त्यामध्येच आता हा ऑडिट रिपोर्ट पुढे आला असून विमानात त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट म्हणण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर संशय व्यक्त केली जात असतानाच हा अहवाल आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आलीत.

Leave a Comment

error: Content is protected !!