शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा:अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याचीही ठाम मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले. राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेत जावे, अशी सर्वांची अपेक्षा असल्याचेही सुळे यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असून, संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पवार साहेबांशी सर्वांचे प्रेमाचे नाते आहे आणि ते राज्यसभेत असावेत, अशी भावना अनेकांच्या मनात आहे, असे सुळे म्हणाल्या. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दरम्यान, सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधून डिस्चार्ज देण्यात आला असून, पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी सक्रिय राहावे, अशी इच्छा आहे, असे सुळे यांनी सांगितले. विमानाचे नियमित सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे या संदर्भात सुळे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित केला. विमान अपघातासारख्या गंभीर घटनांकडे हलक्याने पाहता कामा नये, असे सांगत त्यांनी प्रत्येक विमानाचे नियमित सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे असल्यावर भर दिला. नियमांचे काटेकोर पालन सर्वांसाठी बंधनकारक असले पाहिजे. केवळ एका घटनेपुरती मर्यादित चौकशी नको, तर व्यापक पातळीवर विमानांच्या सुरक्षिततेची तपासणी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. झारखंडमध्ये घडलेल्या अलीकडील घटनेचाही संदर्भ देत त्यांनी त्या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. भारत सरकारने संसदेत स्पष्ट भूमिका मांडावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख करत, याबाबत भारत सरकारने संसदेत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली. तपास प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची शंका किंवा संभ्रम राहू नये, यासाठी पारदर्शकतेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात राजकारण नको, तर सत्य शोधण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!