बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या एका छोट्याशा गावातून संदीपने आपल्या दोन लहान लेकरांना जवळ घेतलं आणि पत्नीच्या हातात थोडेसे पैसे ठेवले. काळजी करू नकोस, महाराष्ट्रात रस्त्याचं काम आहे. दोन पैसे जास्त मिळतील, मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघेल. लवकरच परतेन, असं सांगून 30 वर्षांचा संदीप कुमार सोलापूरच्या जेऊर (ता. अक्कलकोट) गावाच्या दिशेने निघाला होता. त्याच्या डोळ्यात गरिबीवर मात करण्याची स्वप्नं होती आणि हातात रक्ताचं पाणी करून राबण्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही वेगळंच शिजत होतं.
त्या काळ्या दुपारी काय घडलं?
1 ऑगस्ट 2026 ची ती दुपार नेहमीसारखीच होती. संदीप कडक उन्हात रस्त्याच्या कामावर घाम गाळत होता. अचानक 12 च्या सुमारास सागर आणि दयानंद नावाच्या दोघांसोबत त्याची काही कारणावरून बाचाबाची झाली. कारण काय होतं, हे अजूनही गूढच आहे. पण निष्पाप मजुराच्या अगतिकतेचा फायदा घेत त्या दोघांनी संदीपवर अमानुष हल्ला चढवला.
रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुराला अशा प्रकारे रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. संदीप जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता, पण त्या नराधमांचे हात थांबले नाहीत. तो जमिनीवर कोसळला, डोळ्यांसमोर अंधारी आली.
सात दिवसांची मृत्यूशी झुंज
स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संदीपला तातडीने अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. पण जखमा इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांनी त्याला सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्याशुभ्र आणि थंडगार खोलीत संदीप सात दिवस मृत्यूशी झुंज देत होता. प्रत्येक श्वासागणिक त्याला आपल्या पत्नीचा आणि दोन चिमुकल्यांचा चेहरा आठवत असावा. आपण नाही राहिलो तर त्यांच्या पोटाचं काय होईल, हा विचार त्याच्या मनात घोळत असावा. पण 8 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्या शरीराने साथ सोडली. परराज्यातून पोट भरण्यासाठी आलेल्या संदीपची प्राणज्योत मालवली.
एक अर्धवट उरलेली कहाणी
अक्कलकोट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत. पण या कायद्याच्या प्रक्रियेत एका निष्पाप कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. प्रयागराजमध्ये वाट पाहणाऱ्या त्या माऊलीला काय सांगावं? तुझा कुंकवाचा धनी आता कधीच परतणार नाही, हे सांगण्याची ताकद कोणात आहे? संदीपच्या भावाचा अश्रूंचा बांध फुटला होता.
आम्ही गरिबीला कंटाळून कामासाठी आलो होतो, मार खाऊन मरायला नाही, त्याचा हा आक्रोश सोलापूरच्या हवेत अजूनही घुमतोय. दोन मुलांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं आहे. संदीपने रस्त्याचं काम तर केलं, पण त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचा पुढचा रस्ता मात्र अंधारात ढकलला गेला आहे.