सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव शहरातील गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वारंवार वीजखंडितीच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून, वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करत शहरातील नागरिकांनी महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत वीजपुरवठा नियमित, सुरळीत व अखंडित न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
मारेगाव शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून शासकीय कामांसाठी येणारे नागरिक, विद्यार्थी, बँकांमध्ये कामानिमित्त येणारे ज्येष्ठ नागरिक तसेच पेन्शनधारक यांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बँका व शासकीय कार्यालयांमध्ये तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. त्यातच अचानक वीज गेल्याने त्यांची कामे रखडतात आणि पुन्हा बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. गरीब व मजूर वर्गातील नागरिकांचे दैनंदिन कामकाजही विस्कळीत होऊन त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी मारेगाव शहरात येत आहेत. विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन कागदपत्रे, प्रवेश प्रक्रिया व इतर शैक्षणिक कामे पूर्ण करताना वारंवार होणाऱ्या वीजखंडितीचा फटका बसत आहे.
दरम्यान, दिवसभरात अनेक वेळा वीज जाणे-येणे तसेच अचानक वीजपुरवठा खंडित होण्यामुळे घरगुती आणि कार्यालयीन विद्युत उपकरणांवर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा नेमका कधी खंडित होईल, याची निश्चितता नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने अधीक्षक अभियंता, महावितरण, पांढरकवडा यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अभियंता, महावितरण, मारेगाव यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे.
“नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी. सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना अजय रायपुरे, वसंतराव आसुटकर, अनंत मांडवकर, अनिल गेडाम, दुष्यंत जयस्वाल, अनामिक बोडे, अंकुश ऊपाजी माफुर,गणेश मडावी, प्रदीप मत्ते, प्रकाश म्हसे, विलास रायपुरे, गजु चंदनखेडे,प्रशांत डाखरे, अशोक धोबे,यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
महावितरण प्रशासन आता या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे मारेगावकरांचे लक्ष लागले आहे.