Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

आई – बहिणीवरून शिवी दिली तर 500 रुपये दंड:सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 100 रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी कोळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी गावातील सामाजिक वातावरणाबाबत चर्चा करत महिलांचा अपमान करणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दंडासाठी व्हिडिओ पुराव्याची अट या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडिओ पुराव्याची अट ठेवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्याच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. या ग्रामसभेत गावाच्या स्वच्छतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गावातील घर, दुकान किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास संबंधित व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य या ग्रामसभेस सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस एस कवडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, आशासेविका आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. पुढील वर्षी महिला दिन आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शकुंतला देशमुख यांनी महिलांच्या एकजुटीचे कौतुक करत, गावात सन्मान आणि संस्कार जपण्याचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!