प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके, कृषि अधिकारी पौर्णिमा गाडे, कृषि सहाय्यक शेषराव देशमुख व प्रगतशील शेतकरी जयकर मगर उपस्थित होते. “जमिनीचा सामू, विद्युत वाहकता आणि चुनखडीचे प्रमाण या त्रिसूत्रीच्या आधारे जमिनीच्या आरोग्याचे मूल्यमापन केले जाते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून, ते वाढवण्यासाठी आदर्श शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते व जिवाणू खतांचा वापर करावा. जमिनीचा पोत सुधारून सूक्ष्म जीवाणू वाढल्यास पिकांना अन्नद्रव्ये मिळून उत्पादन वाढेल,असा सल्ला डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिला. मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचे वेळापत्रक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा एकात्मिक वापर यावर प्रकाश टाकला. तसेच हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या वाढीच्या अवस्था समजावून सांगत, भुंगेरे गोळा करणे, मशागत, जैविक व रासायनिक नियंत्रण अशा एकात्मिक उपाययोजना सुचवल्या. या मेळाव्यात सहाय्यक कृषि अधिकारी आचपाळे यांनी बियाणे उगवणक्षमता प्रात्यक्षिक सादर केले, तर आदिनाथ धुमाळ यांनी सोयाबीन पेरणीच्या ‘रुंदवाफा सरी’ पद्धतीचे फायदे सांगितले. अवधूत मेहत्रे यांनी बीजप्रक्रियेची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शेतकरी भाऊसाहेब पठारे, यशवंतराव रणनवरे, राजेंद्र कोकणे, शिवाजीराव धुमाळ, विनोद बोडके अवधूत घाडगे, प्रसाद धिरडे आणि गणेश घाडगे उपस्थित होते.