बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे: श्रावण महिना सुरू झाला असून या काळात ग्रहांच्या स्थितीतही काही बदल झाले आहेत. सध्या शनि महाराज मीन राशीत वक्री आहेत. राहू कुंभ राशीत, तर केतू सिंह राशीत आहे. शुक्र कन्या राशीत, बुध कर्क राशीत, सूर्य कर्क राशीत आणि गुरु कर्क राशीत आहेत. तसेच मंगळ मिथुन राशीत आहे. या ग्रहस्थितीचा मेष ते मीन राशींवर वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोणत्या राशींना चांगल्या संधी मिळू शकतात? तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात? याबाबत ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी लोकल18 च्या माध्यमातून सांगितले.
श्रावणात राशींवर ग्रहमानाचा प्रभाव..
तृप्ती भोसले यांनी सांगितले की, मेष राशीला साडेसातीचा काळ सुरू असल्याने जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि काही कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीसाठी आर्थिक बाबतीत चांगले बदल होतील, मात्र अति खर्च टाळावा. मिथुन राशीने करिअरचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, तसेच कामाचे योग्य नियोजन करावे.
388 एकरांचं तपोवन, त्यात जपानी शैलीतलं महादेव मंदिर, महाराष्ट्रातलं प्रसिद्ध ठिकाण माहितीये का? Video
कर्क राशीसाठी गुरुच्या प्रभावामुळे कुटुंब, मानसिक समाधान आणि ज्ञानाच्या दृष्टीने काळ चांगला असून नवीन सुरुवातीसाठीही हा काळ अनुकूल आहे. सिंह राशीने नात्यांमध्ये संयम ठेवावा. कन्या राशीसाठी प्रेम, पैसा आणि सुख-सोयींचे विषय महत्त्वाचे ठरतील, मात्र अतिविचार टाळावा.
तूळ राशीसाठी 2 सप्टेंबरनंतर शुक्राच्या प्रभावामुळे प्रेम, व्यक्तिमत्त्व आणि आर्थिक बाबतीत चांगले बदल होऊ शकतात. वृश्चिक राशीच्या कामात बदल होऊ शकतात, त्यामुळे जुन्या कामांचा पाठपुरावा करावा आणि आर्थिक बाबतीत घाई करू नये. धनु राशीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे मानसिक शांतता आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे.
मकर राशीसाठी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. कुंभ आणि मीन राशींना साडेसातीमुळे अडचणी येऊ शकतात, मात्र हा काळ त्यांना अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. श्रावणात अडथळे आले तरी घाबरू नये, परिस्थिती स्वीकारून सकारात्मक मार्ग काढावा आणि भगवान शिवांची आराधना करावी, असा सल्ला तृप्ती भोसले यांनी दिला आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)