महिला टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. एजबॅस्टन येथे भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावा केल्या. भारताकडून स्मृती मंधानाने अर्धशतक झळकावले; तिने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांची खेळी केली, तर ऋचा घोषने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर तस्मिया रुबाब आणि रामीन शमीम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १७ षटकांत १०६ धावांत सर्वबाद झाला. मुनीबा अलीने सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने १० धावांत ५ बळी घेतले; श्री चरणीने ३ बळी घेतले आणि शेफाली वर्माने एक बळी घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर चौथ्यांदा हस्तांदोलन नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये ‘हस्तांदोलन न करण्याची’ प्रथा कायम आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता, भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी सामन्यांदरम्यान पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. या प्रथेची सुरुवात सप्टेंबर २०२५ मधील आशिया चषकादरम्यान झाली, जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. ही परंपरा फेब्रुवारी २०२६ मधील पुरुष टी-२० विश्वचषक आणि ऑक्टोबर २०२५ मधील महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही कायम राहिली. आता बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात, हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना नाणेफेकीसाठी समोरासमोर आल्या, परंतु त्यांनी हस्तांदोलन केले नाही.
