महानगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 200 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून लवकरच हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका होत असून यामध्ये कोकण, नाशीक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर विभागातील महानगर पालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांतेत पार पडावी तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्तासोबतच राज्य राखीव दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. या महानगर पालिकांसाठी गुरुवारी ता. 15 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून शुक्रवारी ता. 16 रोजी मतमोजणी होणार आहे. या पालिका निवडणुकीत मतदान कालावधीत तसेच मतमोजणीच्या वेळी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस दला सोबतच इतर जिल्हयातील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील 200 पोलिस कर्मचारी पाठविले जाणार आहेत. यामधे जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत काही कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी नियुक्त कर्मचारी रवाना केले जाणार आहेत. यामध्ये 80 पोलिस कर्मचारी मुंबई येथे पाठविले जाणार असून 20 पोलिस कर्मचारी छत्रपती संभाजीनगर येथे तर 100 पोलिस कर्मचारी नाशीक येथे पाठविले जाणार आहेत. शनिवारपर्यंत ता. 17 रोजी हे कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणावर बंदोबस्तासाठी राहणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच या कर्मचाऱ्यांची हिंगोलीत पुन्हा रवानागी होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
