चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकांचा एक गट भाजपच्या संपर्कात:माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा; शिवसेनेच्या ठाकरे गटाशीही बोलणी सुरू

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेससह अनेक पक्षांचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत येण्यास तयार आहेत, असे ते म्हणालेत. चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल गत शुक्रवारी लागला. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या. तर भाजपला 24 जागांवर समाधान मानावे लागले. येथे या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेससह अनेक पक्षांचे उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काँग्रेसच्याही एका गटाला असे वाटते की, शहरात आपण जनतेला काय उत्तर देणार? उद्या शहरात विकासच झाला नाही तर काय होईल? या शहराचे स्वच्छतेचे विषय आहेत. विजेच्या संदर्भातील विषय आहेत. या शहरात उद्या पगार द्यायलाच पैसे राहिले नाही, तर मग महापालिकेत नगरसेवक म्हणून आपण काय काम करायचे? या परिस्थितीत जनतेला उत्तर देणे अवघड होईल असे विविध प्रश्न त्यांना पडले आहेत, असे सुधीर मुनगंटीवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजपची ठाकरे गटाशीही चर्चा सुरू ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्याही अनेक नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. तुम्ही भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत असे ते म्हणालेत. या प्रकरणी आमची त्यांच्याशी दोनवेळा चर्चाही झाली आहे. पहिल्या भेटीतच महापौर पद कुणालाही देता येणार नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजपचाच महापौर करावा लागेल. भाजप कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गटाला महापौर पद देणार नाही. प्रसंगी भाजप विरोधी बाकावर बसेल. भाजपला मुनगंटीवार – जोरगेवारांच्या वादाचा फटका उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या अंतर्गत वादामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान महापौर राखी कांचलवार यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने दारुण पराभव केला. गत महापालिका निवडणुकीत भाजपने थेट 36 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. पण यावेळी त्यांना केवळ 24 जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच काँग्रेसने येथे सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यामुळे भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, या ठिकाणी कोणत्या पक्षाचा महापौर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!