गुलाबराव पाटलांना बिहार प्रेमाचे भरते:म्हणाले – बिहारी माणूस येथे येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांत काम करण्याची वृत्तीच उरली नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्यावरून बिहारी तरुणांचे कौतुक करत मराठी तरुणांना खडेबोल सुनावले आहेत. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण मात्र त्यांच्यावर टीका करतो. आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही, असे ते म्हणालेत. मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या मुद्यावरून रान पेटले असताना गुलाबरावांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले, आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता? आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असे ते हसत म्हणाले. सुभाष देसाईंवर साधला निशाणा ते पुढे म्हणाले, आपण नुसत्या गप्पा मारतो की, अंबानी शून्यातून कसे मोठे झाले. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हीही प्रयत्न करून पाहा. मी काय राजकारणी होतो का? पण आता आमच्या धंद्यात आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टीत नैपुण्य दाखवण्याची गरज आहे. जळगावच्या एमआयडीसीला डी प्लसचा दर्जा देण्यासाठी मी 7 वर्षे लढा दिला. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी सुभाष देसाई हे आमचे उद्योगमंत्री होते. ते लक्ष देत नव्हते. ते माझ्याकडे पाहायचेही नाही. एकेदिवशी पक्षाच्या बैठकीत मी त्यांना थेट बोललो की, आमच्याकडेही पाहत चला. मी काही तुमच्याकडे उधारी मागायला आलो नाही. स्पष्टपणे बोललो. पण त्यानंतरही त्यांनी आमचे काम केले नाही. अखेर हा विषय मंत्रिमंडळात मंजूर झाला. या मुद्यावरून बैठकीत अनेकदा वाद झाला. छोटे-छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील. आपल्याला आपल्या जिल्ह्यातील केळीवर आधारित उद्योगांचीही मोठी गरज आहे. राज्यातील अंगणवाड्यांतील पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबरावांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. जळगावात येणारी कोको कोला कंपनी जामनेरला गेली. जामनेर चाळीसगावात गेले. आपण आमदार आहेत की नाही हे एकदा बघावे लागेल. विशेषः पुढच्यावेळी मला कोट घालून दावोसच्या दौऱ्यावरही जावे लागेल, असे ते म्हणाले. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे संकेत उल्लेखनीय बाब म्हणजे गुलाबराव पाटलांनी शुक्रवारी राजकारणात काहीही होऊ शकते असे नमूद करत भविष्यात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत दिले होते. आता दोन्ही भाऊ (राज व उद्धव ठाकरे) एकत्र आलेत. प्रत्येकाचा एक विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. कोण कधी कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. आता आपण एमआयएमची कुणासोबत युती आहे हे पाहत आहोत. त्यामुळे कुणी कुणासोबतही जाऊ शकते. या प्रकरणी कुणीही काहीही कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र येतील का? तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!