मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्या नावासंदर्भात उच्च न्यायालयाने काही ताशेरे मारले होते. ते दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. पार्थ पवार यांनी याप्रकरणी चौकशीला सामोरे जाऊन नंतर क्लीन होऊन बाहेर पडायला हवे, असे मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान संजय राऊत यांचे हे वक्तव्य महत्त्वाचं ठरत आहे. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत एक ते दीड तास बंद दाराआड चर्चा केली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटल आहे. वास्तविक दोन्ही पक्षांची विलीनीकरणाची चर्चा आधीपासून सुरू होती. याची माहिती आमच्याकडे देखील होती. मात्र त्यामध्ये शिवसेना किंवा काँग्रेस यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा परिणाम? याविषयी आम्ही नंतर बोलू, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. मात्र तटकरे आणि प्रफुल्ल पाटेल यांच्यासारख्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या चेल्यांना हे विलीनीकरण नको आहे. त्यामुळे तशी मोदी- शहांची इच्छा असेल, असा टोला देखील त्यांनी लगावला. पार्थ पवार यांना मिळालेल्या क्लीनचीटच्या मुद्द्यावर राऊतांनी सडेतोड भूमिका घेतली. हायकोर्टाने यापूर्वी केलेल्या ताशेरांचे स्मरण करून देत, ते सहज पुसले जाणार नाहीत, असे ते म्हणाले. फडणवीस कायद्याचे रक्षक नाहीत. महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नाही, असा आरोप त्यांनी केला. पार्थ पवारांनी चौकशीला सामोरे जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करायला हवे होते, असे ते म्हणाले. या संदर्भात बेनामी व्यवहार, असा शब्दप्रयोग करत, सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर त्यांनी थेट टीका केली. फडणवीसांवर अजित पवारांचा विश्वास नसेल विलिनीकरणाच्या चर्चांवर पुन्हा भाष्य करताना राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. फडणवीसांवर अजित पवारांचा विश्वास नसेल, असे ते म्हणाले. काही चर्चा सुरू असल्याची माहिती आम्हाला होती, मात्र त्या चर्चांना खीळ बसली, असा दावा त्यांनी केला. अजित पवार गटातील काही नेत्यांची भूमिका पाहता, ते शरद पवारांना पुन्हा सोबत घ्यायला इच्छुक नाहीत, असे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत मोदी-शहा यांची भूमिका काय आहे, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हेच रोचक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांनी स्पष्ट भूमिका घेतली. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांनी त्यावर निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. प्रत्येक वेळी इतर पक्षांच्या घडामोडींवर प्रश्न विचारण्याची गरज नसल्याचे सांगत, सध्या सुनील तटकरे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हेच फार रोचक आहे, असा टोला त्यांनी लगावला. अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याचे त्यांनी नमूद केले. राऊतांनी पुढे सांगितले की, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात स्थान दिले, पद आणि प्रतिष्ठा दिली, तेच आता शरद पवारांना सल्ले देताना दिसत आहेत. हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी या प्रक्रियेशी शिवसेनेचा संबंध नसल्याचे पुन्हा अधोरेखित केले. शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये काय चर्चा झाली, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संयम बाळगण्याचे आवाहन महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकबाबत बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवारांचा पक्ष या आघाड्यांचा घटक आहे. सध्या एक गट म्हणतो चर्चा झाली, दुसरा म्हणतो झाली नाही, अशा परिस्थितीत विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्व चर्चांमुळे राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी सूचित केले. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या वैयक्तिक दुःखाबाबत बोलताना राऊतांनी पत्रकारांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. सुनेत्रा ताईंनी पती गमावला आहे आणि शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या गमावला आहे. अशा वेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करू नये, असे ते म्हणाले. या प्रसंगी संवेदनशीलता राखली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचा महापौर म्हणजे काळा दिवस मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. मुंबईत भाजपचा महापौर बनणं हा मुंबईसाठी, 106 हुतात्म्यांसाठी आणि मराठी मनासाठी काळा दिवस ठरेल, असा दावा त्यांनी केला. मुंबईची अस्मिता आणि ओळख कमकुवत करण्याचे काम भाजपने सातत्याने केले असल्याचा आरोप करत, भविष्यात मुंबई उद्योगपतींच्या हाती सोपवली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजपची भूमिका ही मुंबई स्वतंत्र करण्याच्या विचाराशी जोडलेली असल्याचा आरोप त्यांनी केला.
