मुंबई मनपात शपथविधीलाच गोंधळ:ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाषणाची प्रत फाडली, वॉकआऊट; बॉडी लँग्वेजवर देखील आक्षेप

मुंबई महापालिकेच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर आज महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड होऊन त्यांचाही शपथविधी पार पडला. या सोहळ्यामुळे महापालिकेचे कामकाज औपचारिकपणे सुरू झाल्याचे चित्र दिसले. मात्र, पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला. काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली, तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट केल्याने वातावरण ढवळून निघाले. महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी फाडल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी सभागृह सोडले. या प्रकारामुळे गोंधळ वाढला. ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज आक्रमक आणि विक्षिप्त होती, असा आरोप केला. या आरोपांमुळे राजकीय वाद आणखी चिघळला. या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पीठासन अधिकारी आणि आयुक्तांनी महापौर व उपमहापौर निवडीची घोषणा केल्यानंतर सभागृहाचे कामकाज संपले होते. त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. काँग्रेसला महाराष्ट्रात जागा नाही, म्हणूनच त्यांच्या नगरसेवकांना जागा मिळाली नाही, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून सभात्याग वारंवार होत असतो, मात्र आजच्या दिवशी तो होईल असे वाटले नव्हते, असेही त्यांनी नमूद केले. घाडी पुढे म्हणाले की, लोकशाहीला साजेसं वर्तन अपेक्षित होतं. जनतेनेच दाखवून दिलं की, खोके कोणाकडे आणि ओके कोण झाले. जिल्हा परिषदेत आमचे दुसऱ्या क्रमांकावर प्रतिनिधी निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांनी विचार करावा की ओके कोण झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री यांच्या योजनांमुळे शहर आणि ग्रामीण भागातील महिला समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आजमी यांनी वेगळीच भूमिका मांडली. त्यांच्या मते, काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना सभागृहात बसायला जागा देण्यात आली नाही. भाजपच्या पहिल्या महापौरांनी खुर्ची घेतली असताना काँग्रेसच्या महिला नगरसेविका मात्र जमिनीवर बसल्या होत्या. प्रदूषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलेल्या नगरसेविकांना आसन न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॉडी लँग्वेज वेगळी आणि आक्रमक किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांनी कोणताही गोंधळ घातला नाही. मात्र शिंदे गटाच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज वेगळी आणि आक्रमक होती. मुंबईत महिला महापौर बसत आहेत, त्यांना शुभेच्छा देत त्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, अशा प्रकारचे वर्तन सभागृहाच्या वातावरणाला शोभणारे नव्हते. बसण्याची योग्य व्यवस्था का नव्हती मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, आम्ही मागच्या बाजूला होतो, घोषणा आणि कलकलाट ऐकू येत होता. निवडणूक बिनविरोध होती, त्यामुळे घोषणांचा प्रश्न नव्हता. तरीही गोंधळ कसा झाला हे समजले नाही. 227 नगरसेवक उपस्थित असताना बसण्याची योग्य व्यवस्था का नव्हती, असा सवाल त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!