राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील एक महिन्याच्या आतच अध्यक्ष निवडणूक पार पाडण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कालावधीतच पक्षांतर्गत प्रक्रिया पूर्ण करून नव्या अध्यक्षांची घोषणा करण्याचा विचार असल्याचे सांगितले जाते. राज्यातील पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, शपथविधीपूर्वी त्यांनी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना भेटून त्यांना माहिती दिली होती. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर दूरध्वनी केल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी येण्याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतही मागील काही दिवसांत चर्चा रंगली होती. शरद पवारांच्या गटाकडून एकत्र येण्याचे प्रस्ताव अजित पवारांकडे येत असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ स्तरावर चर्चिली गेली होती. या प्रस्तावांबाबत अजित पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अवगत केले होते. मात्र, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची गरज असल्याचे पक्षाने मानले होते. सूत्रांच्या दाव्यानुसार, या विषयावर मोदी किंवा शहा यांच्याशी कोणतीही चर्चा प्रत्यक्षात झाली नव्हती. भविष्यातील निर्णय सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते घेतील, असे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सुनेत्रा पवार लवकरच दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भेटीनंतर पक्षाच्या पुढील राजकीय धोरणाबाबत स्पष्टता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसह एकत्रीकरणाच्या चर्चांनाही नवे वळण मिळू शकते. पक्षातील अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी पुढे आणली आहे. या मागणीला आता प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्र पाठवले आहे. हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठाम उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती. 28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान त्यांच्या खाजगी विमानाचा अपघात झाला. सकाळी 8.46 वाजता झालेल्या या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात दुःखाची भावना पसरली. 29 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखो समर्थक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात मोठे बदल होण्याची चिन्हे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पक्षाला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून पक्षातील हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याच्या दिशेने पावले पडत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
