मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून 11 फेब्रुवारीला महापौर निवडीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या अवघ्या 15 मिनिटे आधी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतरच्या घडामोडीही तितक्याच निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ स्पष्टपणे वरचढ असतानाही शिवसेना ठाकरे गट महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे. संख्यात्मकदृष्ट्या कमी ताकद असूनही राजकीय संदेश देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पर्याय ठाकरे गट तपासत असल्याची माहिती मिळते. 7 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून अर्ज दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर गटनेत्या किशोरी पेडणेकर आणि काही अनुभवी नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते. मुंबई महापालिकेच्या 2026 च्या अंतिम निकालानुसार भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे 65, शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 29, काँग्रेसकडे 24, मनसेकडे 6, एमआयएमकडे 8, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3, समाजवादी पक्षाकडे 2 आणि एनसीपी (शप) कडे 1 अशी जागांची विभागणी आहे. एकूण 227 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात महायुतीला स्पष्ट आघाडी मिळत असल्याने महापौरपद त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. दरम्यान, यंदा मुंबईच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या पदावर महिला प्रतिनिधी निवडली जाणार हे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळाली आहे. महिलांसाठी खुले असलेल्या या आरक्षणामुळे महायुती आणि इतर पक्षांमधील महिला नगरसेवकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात महिलांच्या नेतृत्वाचा आणखी एक अध्याय जोडला जाणार आहे. महायुतीकडून संभाव्य उमेदवारांमध्ये तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. वॉर्ड क्रमांक 2 हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा पराभव करत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या या विजयामुळे आणि सक्रिय राजकीय उपस्थितीमुळे त्यांचे नाव महापौरपदासाठी पुढे येत आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महायुतीतील इतर काही महिला नगरसेवकांची नावेही चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीला वेगळेच राजकीय रंग शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास निवडणुकीत प्रतीकात्मक लढत पाहायला मिळू शकते. संख्याबळ कमी असले तरी राजकीय भूमिका ठळक करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मातोश्रीवरील बैठकीनंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या या हालचालीमुळे निवडणुकीला वेगळेच राजकीय रंग चढले आहेत. निवडणूक अधिक उत्सुकता निर्माण करणारी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे आणि अंतिम मतदान या सर्व टप्प्यांत घडणाऱ्या राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत. महायुतीच्या संख्याबळामुळे महापौरपद त्यांच्या बाजूने झुकत असले तरी विरोधकांच्या हालचालींमुळे ही निवडणूक अधिक उत्सुकता निर्माण करणारी ठरत आहे. मुंबईच्या सत्ताकारणातील पुढचा अध्याय आता काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
