छत्रपती संभाजीनगर शहरात वीजांच्या कडकडाटासह कोसळधारा:राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत असून द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी यांसारख्या नगदी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. आज रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर शहरासह अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या पावसात मोठ्या प्रमाणावर गारांचा वर्षाव झाल्याने सोयगाव शहर आणि परिसरात रस्त्यांवर तसेच घरांच्या छतावर गारांचा पांढराशुभ्र थर साचला होता. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या या अनपेक्षित गारपिटीमुळे वातावरणात तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी, या संकटामुळे शेती आणि फळबागांच्या संभाव्य नुकसानीची भीती अधिक गडद झाली आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिल्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास फलटण तालुक्यातील धुमाळवाडी आणि गिरवी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. सुमारे अर्धा तास कोसळलेल्या या गारांच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळिंब बागा आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला असून, सटाणा तालुक्यातील ताहाराबाद, मुल्हेर आणि अंतापूर परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचीही मोठी धावपळ उडाली असून, संपूर्ण परिसरात एकच दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Comment

error: Content is protected !!