देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट २०२६’ (NEET 2026) ही परीक्षा अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आणि वाढता दबाव लक्षात घेता केंद्र सरकारच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गैरप्रकारावर सडकून टीका केली आहे. “281 प्रश्न असलेल्या guess paper मधील 131 प्रश्न जसेच्या तसे NEET च्या प्रश्नपत्रिकेत येत असतील, तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणे योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी,” अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. गैरप्रकाराबाबत अगोदरच काळजी का घेत नाही? रोहित पवार यांनी पेपर लीक झाल्याने NEET परीक्षा रद्द करून चौकशीचे आदेश दिल्याबद्दल NTA चे आभार मानले. परंतु पेपर फुटीनंतर जाग्या होणाऱ्या यंत्रणा अगोदर नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो, असेही ते म्हणालेत. परीक्षा रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांना पालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता, गैरप्रकार होणार नाहीत याची अगोदरच काळजी का घेतली जात नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. किमान यापुढे काळजी घेतली जाईल तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून चाप लावला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार अन् यंत्रणेचा हलगर्जीपणा दुर्दैवी – सुप्रिया सुळे यावर प्रतिक्रिया देताना, हा प्रकार धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “२२ लाख मुले या परीक्षेला बसली आहेत. अशा परिस्थितीत इतके तंत्रज्ञान असताना, एआय वगैरेची चर्चा असताना दुसरीकडे एक पेपर फुटतो. २२ लाख मुलांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. मी एक आई आहे. ज्या कुटुंबात शिक्षणाला महत्त्व असते, तिथे अशा परीक्षांमध्ये संपूर्ण कुटुंब गुंतलेले असते.” सामान्य माणसाने या देशात जगायचे कसे? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सरकार आणि त्या यंत्रणेकडून इतका हलगर्जीपणा होत असेल तर हे दुर्दैवी आहे. शिक्षणासाठी नवे धोरण या सरकारने आणले. त्यातून फार काही क्रांती घडली नाही. पण ते होणे सोडा, इथे मुले उन्हातान्हातून २२ लाख मुले परीक्षेसाठी गेले, पैसे खर्च होतात, वेळ जातो. सामान्य माणसाने या देशात जगायचे कसे? ईडी-सीबीआय विरोधकांच्या मागे लावली जाते, तशी या प्रकरणात लावली जावी. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे.” एवढी मोठी यंत्रणा इतकी कुचकामी कशी ठरते? – रोहिणी खडसे
सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही? – विकास लवांडे 2024 मध्येही पेपर लीक झाला होता 2024 मध्येही NEET UG परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे काही केंद्रांवर रद्द करण्यात आली होती. परीक्षा 5 मे 2024 रोजी झाली होती. 6 मे रोजी NTA ने पेपर लीक झाल्याचा इन्कार केला होता. यानंतर बिहार (पटना) आणि झारखंड (हजारीबाग) येथे चौकशी झाली. चौकशीत पेपर लीक झाल्याचे पुरावे मिळाले आणि अनेक अटकही झाल्या होत्या. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता आणि काही केंद्रांवर 1539 उमेदवारांची पुन्हा परीक्षा झाली होती. पेपर लीकच्या आरोपांव्यतिरिक्त, 67 विद्यार्थ्यांना 720/720 गुण मिळणे आणि एकाच केंद्रातून अनेक टॉपर येणे हे देखील मोठ्या वादाचे कारण बनले होते. NTA चा ‘फ्लॉप’ रेकॉर्ड: ८ वर्षांत १६ वेळा नामुष्की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८ मध्ये स्थापन झाल्यापासून या एजन्सीकडून सातत्याने गोंधळाचा कारभार झाल्याचे समोर आले आहे. गेल्या ८ वर्षांत NTA वर तब्बल १६ वेळा परीक्षा रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. ही आकडेवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेच वर्ष 2024 मध्ये लोकसभेत दिली होती. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुझुमदार यांनी लेखी उत्तर दिले होते. NTA ने आतापर्यंत ५.४ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याचा दावा केला असला तरी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा या यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.
