Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

रुपाली चाकणकर, सुनील तटकरेंना झटका:सरपंचपदाच्या निवडणुकीत चाकणकरांचा भाऊ पराभूत; तटकरेंची दिवेआगर ग्रामपंचायत गेली

राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक आज पार पडली. त्यात अनेक धक्कादायक निकाल लागलेत. बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला, तर तिकडे दौंडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भावाचाही पराभव झाला. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बुरूज ढासळला आहे. इथे दिवेआगर ही महत्त्वाची ग्रामपंचायत त्यांच्या हातून गेली आहे. यामुळे त्यांनाही जबर झटका बसला आहे. रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे त्यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व नंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले होते. त्यानंतर आता त्यांना त्यांच्या भावाच्या पराभवाचाही धक्का सहन करावा लागला आहे. दौंडच्या नांदूर ग्रामपंचायत निवडणुकीत रुपाली चाकणकर यांचा सख्खा भाऊ संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे. विशाल नरेंद्र थोरात यांनी त्यांना 304 मतांनी पराभवाची धूळ चारली. स्थानिकांच्या मते, संतोष बोराटे यांच्या कार्यपद्धतीमुळे गावात नाराजी होती. त्यातूनच त्यांचा पराभव झाला. तटकरेंना दिवेआगरमध्ये पराभवाचा धक्का दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातील 18 ग्राम पंचायतींसाठी काल निवडणूक झाली. त्यात श्रीवर्धनधील दिवेआगर ग्रामपंचायतीमधील निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथे दिवेआगर विकास आघाडीचे नेते विजय तोडणकर सरपंच म्हणून निवडून आलेत. श्रीवर्धन हा मंत्री अदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे त्यांच्या पॅनलचा पराभव झाल्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. दिवेआगारला मनमानी, हुकूमशाही व लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण चालणार नाही, असा इशारा नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी या प्रकरणी खासदार सुनील तटकरेंना दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतही राष्ट्रवादीला जबर धक्का बसला होता. दिवेआगार ही 11 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. येथे वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीच्या विरोधी गटाने 8 सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल देत 8 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या रिक्त 8 जागा आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये सरपंच आणि 3 सदस्य दिवेआगार विकास आघाडीचे (राष्ट्रवादीविरोधी गट) निवडून आले आहेत. यामुळे तटकरेंना जबर धक्का बसला. हे ही वाचा… भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!