शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर काही ठिकाणी तुटवड्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे. या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवार १६ जून रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक तात्काळ खुला करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खतांसाठी शेतकरी कृषी केंद्रांच्या चकरा मारत आहेत. परंतु, त्यांना खत मिळत नाही. काही ठिकाणी दुप्पट दराने शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. ही परिस्थिती तात्काळ बदलून शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरण्यात आला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमित अढाऊ यांनी सांगितले की,”रेंक लागली नाही,उद्या लागेल,परवा लागेल अशी केवळ थातूरमातूर उत्तरे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. काळाबाजार करून शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट सुरू आहे. हा प्रकार थांबवण्यात येऊन प्रशासनाने दोन दिवसांत बफर स्टॉक खुला करावा.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे.संरक्षित साठा बफर स्टॉक तातडीने खुला करण्यात येऊन प्रत्येक तालुक्याला मिळालेल्या साठ्याची माहिती जाहीर करणे आणि पुढील १५ दिवसांसाठी पुरवठ्याचे नियोजन करणे अशा मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ,जिल्हा उपाध्यक्ष,तालुका अध्यक्ष, युवक आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
