तुमचे ‘राजे’ कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक पक्ष सोडून का जात आहेत याचा कधी विचार केला आहे का, असा सवाल करत तुमचे ‘राजे’ कधी मातोश्री किंवा मुंबईच्या बाहेर पडले आहेत का? आणि त्यांनी कधी कोणत्या शिवसैनिकाला मदत केली आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. नरेश म्हस्के म्हणाले, उभाठा गटाने आधी आत्मपरीक्षण करावे, आणि मग शिंदे साहेबांना दोष द्यावा, ते खासदार आमच्यासोबत येतील, नाही येतील माहिती नाहीत. पण साधा कार्यकर्ता देखील तुमच्याकडे राहत नाही. 65 नगरसेवक तुमचे निवडून आले आहेत, पण ते देखील तुमच्याकडे राहतील का? हे बघत रहा आता, असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ हा चर्चेचा मुख्य विषय बनला असून, उद्धव ठाकरे गटाच्या नऊपैकी तब्बल सात खासदारांचे पक्षांतर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाही या अनुषंगाने केला जात आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांवर ट्विट करत टीका केली आहे, ते म्हणाले, अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असे राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!