बातमी ऐका (Marathi Voice Reader)
चंद्रपूर: घरकामासाठी अवैधरित्या वाहून नेलेला वाळूचा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी आणि त्यावरील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणे भद्रावती येथील वन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत भद्रावती वनक्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनपाल, वनरक्षक आणि त्यांच्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे वन विभागात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रकरण नेमकं काय?
तक्रारदार नागरिक आपल्या घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक करत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर भद्रावती येथील वनपथकाने या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली होती. जप्त केलेला ट्रॅक्टर सोडवून देणे आणि त्यासंबंधीची कार्यालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी वनपथकातील कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
एसीबीकडे तक्रार, सापळा रचून बेड्या ठोकल्या
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, त्यात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने भद्रावती परिसरात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला.
तक्रारदाराकडून लाचेची २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि त्यांच्या वतीने पैसे स्वीकारणारा खाजगी इसम ललित नागपुरे या तिघांनाही एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
पुढची कारवाई सुरू
एसीबीने तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कोणीही लाचेची मागणी केल्यास थेट एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास चंद्रपूर एसीबीचे पथक करत आहे.