बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर: आईवडील आषाढी वारीत खेळणी विकण्यासाठी पंढरपूरला गेले. मागे 25 वर्षीय विवाहित तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे धक्कादायक घटना घडली. टॉवेलमध्ये दगड बांधून विहिरीत उडी घेऊन कालिदास अण्णा इंगोले (वय 25, रा. अजनाळे) याने जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेने इंगोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालिदासचे आई-वडील आणि चुलते आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे खेळणी विक्रीसाठी गेले होते. कालिदास हा गावातच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कालिदास पत्नी पूजा हिला काहीही न सांगता घरातून निघून गेला होता.
घरात वाद झाला अन् आई लेकीला घेऊन रागात बाहेर पडली; रविवारी पहाटे ते दृश्य पाहून सगळेच हादरले
सायंकाळी 5 वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने पंढरपूरहून आलेल्या आई-वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर रिंग जात होती, मात्र कालिदास प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी गावात शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध सुरू असताना श्रीरंग कोळवले यांच्या विहिरीच्या काठावर कालिदासची चप्पल आणि मोबाईल आढळून आला. संशय आल्याने कांतीलाल कोळवले यांनी विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली असता, अंगाला टॉवेलमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत कालिदास सापडला.
कालिदास याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चुलते गिरीधर नाथबाबा इंगोले यांनी सांगोला पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.