बातमी ऐका (Marathi Voice Reader)
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथून मन सुन्न करणारी अत्यंत भावुक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. थोरल्या भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या अर्ध्या तासात धाकट्या भावाने देखील जगाचा निरोप घेतला. या घटनेने संपूर्ण केळगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळगाव येथील रहिवासी भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय ९० वर्षे) हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते. शुक्रवारी थोरल्या भावाला पाणी आणि दूध पाजण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू माणिक निवृत्ती राठोडकर (वय ८५ वर्षे) हे त्यांच्याजवळ गेले. मात्र, त्याच वेळी भाऊराव यांची प्राणज्योत मालवली. आयुष्यभर एकत्र राहिलेल्या आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या मोठ्या भावाचं असं अचानक निघून जाणं धाकट्या भावाच्या जिव्हारी लागलं. मोठ्या भावाच्या मृत्यूचा जबर धक्का बसल्यामुळे अवघ्या अर्ध्या तासातच माणिक राठोडकर यांनीही अखेरचा श्वास घेतला.
आयुष्यभर जिव्हाळा, कधीही झाला नाही वाद
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊराव आणि माणिक या दोन्ही भावांमध्ये आयुष्यभर प्रचंड जिव्हाळा होता. दोघांनी आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवलं, संकटात एकमेकांना खंबीर साथ दिली, दोघांमध्ये कधीही कुठला वाद किंवा भांडण झाले नाही. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन भावांवर नियतीने एकाच दिवशी घाला घातला. या घटनेनं संपूर्ण केळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी दोन्ही भावांची गावातून एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली. एकाच चितेवर दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या भावांना एकाच दिवशी निरोप देताना उपस्थित नातेवाईक आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.