करिअरचे स्वप्न डोळ्यांत घेऊन महाराष्ट्रातून चेन्नई येथे ‘कॉग्निझंट’ (Cognizant) या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली आहे. शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोल्डन बीचवर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला समुद्राच्या मोठ्या लाटेने ओढले. या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. मयुरी हरिश्चंद्र चौधरी असे मृत तरुणीचे नाव आहे. सेल्फी घेण्याच्या नादात उसळलेल्या १० ते १५ फुटांच्या लाटेने या विद्यार्थ्यांचा घात केला. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १५ तरुणांचा एक गट चेन्नईतील ‘कॉग्निझंट’ (Cognizant) या नामांकित कंपनीत इंटर्नशिप करत आहे. शनिवारी सुट्टी असल्याने हे सर्वजण पाँडिचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते. सेल्फीचा मोह जीवावर बेतला यावेळी त्यांना समुद्र किनारी उसळणाऱ्या लाटांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. मात्र, हा मोह त्यांच्या जीवावर बेतला. समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटत असताना मुलांचा गट सेल्फी काढण्यात मग्न होता. त्याच वेळी समुद्रात १० ते १५ फुटांची एक लाट उसळली आणि या गटातील तीन तरुणांना आपल्या कवेत घेऊन खोल समुद्रात ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले. तरुणीचा मृत्यू, एक जण बेपत्ता या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) या तरुणीचा मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. तर जय पाटील या विद्यार्थ्याचा अद्याप शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि तटरक्षक दलातर्फे शोधमोहीम राबवली जात आहे. तिघांपैकी राज केदारी हा विद्यार्थी या संकटातून सुखरूप बाहेर पडला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात उसळलेल्या लाटेने या विद्यार्थ्यांचा घात केला. मयुरीच्या घरासमोर जमले लोक
मयुरीच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
नातेवाईक चेन्नईकडे रवाना बेपत्ता जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नईत पोहोचले असून, मृत मयुरी चौधरी यांचे कुटुंबीय नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. या संदर्भात भंडारा जिल्हा प्रशासन तामिळनाडू येथील स्थानिक प्रशासन सोबत व पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून बचावकार्यात वेग आणण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री स्वतः या सर्व परिस्थितीवर आणि मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
