बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त आगळावेगळा उपक्रम; सौ. किरण देरकर यांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, वणी
वणी, दि. २८ ऑगस्ट : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून समाजातील परस्पर विश्वास, संरक्षण, जबाबदारी आणि आपुलकी अधिक दृढ करण्याचा स्नेहबंध आहे. याच भावनेतून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सामाजिक व सेवाभावी कार्याची चळवळ उभी करण्याचे आवाहन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. किरण देरकर यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राखी पौर्णिमेचे औचित्य साधून वणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित रक्षाबंधन कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या पत्नी सौ. किरण देरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राखी बांधून व भेटवस्तू देऊन स्नेहबंध अधिक दृढ करण्यात आले.
राजकारणापलीकडे समाजसेवेची ओळख निर्माण करा
पक्षाचे संघटन केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता ते समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असे सांगताना सौ. देरकर म्हणाल्या की, प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजाच्या अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, स्वच्छता अभियान तसेच रोजगार व मार्गदर्शन शिबिरांसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संदेश त्यांनी दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात समाजोपयोगी कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असेही त्या म्हणाल्या.
बूथ ते गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करण्याचा निर्धार
रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्याला संघटनात्मक एकजुटीची जोड देत बूथपासून गावपातळीपर्यंत पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन सौ. किरण देरकर यांनी केले. पक्षाची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांना राखी बांधून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. स्नेह, आपुलकी आणि विश्वासाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.

पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मनोगते
कार्यक्रमात संजय निखाडे, डिमन ताई टोंगे, गणपत लेडांगे, सुनील कातकडे, समीर लेनगुळे, पुरुषोत्तम बुटे, संतोष कुचनकर, सुरेखा ताई ढेंगळे, ममता ताई पारखी, तात्याजी पावडे, सुधीर थेरे, मधुकर लांडे, देवाभाऊ बोबडे, नेताजी पारखी, विनोद ढूमने, अजय धोबे, रसुल रंगरेज, गुलाबभाऊ आवारी व विजय ताजणे यांनी मनोगते व्यक्त करत रक्षाबंधनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा संघटक गणपत लेडांगे, नगरपरिषद गटनेते सुधीर थेरे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, युवासेना जिल्हाप्रमुख समीर लेनगुळे, चंद्रपूर जिल्हा युवासेना अध्यक्ष विक्रांत सहारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे, सहकार क्षेत्राचे उपाध्यक्ष संजय देठे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, पुरुषोत्तम बुट्टे, शहरप्रमुख विनोद ढूमने, महेश सोमलकर, तुलसी तेवर, आत्मा समिती अध्यक्ष तात्याजी पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महिला जिल्हाप्रमुख डिमन ताई टोंगे, शिवसेना ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हाप्रमुख सरपंच गीताताई उपरे, महिला तालुकाप्रमुख सुरेखाताई ढेंगळे, मारेगावच्या महिला तालुकाप्रमुख इंदूताई किन्हेकार, महिला तालुका सचिव पौर्णिमाताई राजुरकर, झरी तालुका संपर्कप्रमुख ममता ताई पारखी, छबुताई आसूटकर, अमीनाजी पठाण, महिला शहरप्रमुख सविताताई गुलाबराव आवारी, चंदाताई मुन, कीर्तीताई देशकर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, कांचनताई देरकर, प्रणाली ताई देवाळकर, वैशालीताई देठे,
जिजाताई वरारकर तसेच वेणूताई झोडे, मंजूताई इनामे व वर्षाताई पोटे यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुरुष व महिला पदाधिकारी, युवासेना, युवती सेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या आगळ्यावेगळ्या कौटुंबिक स्नेहमिलनातून स्नेहबंध, संघटनात्मक एकजूट आणि समाजसेवेची त्रिसूत्री अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला. सण-उत्सव हे केवळ आनंदाचे निमित्त न ठरता समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचे माध्यम बनले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.