Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

कुंकवाचे मोल जपणारी मायशक्ती

अठराविश्व दारिद्र्यावर मात करणारी शांताबाई गदाईंची संघर्षगाथा

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: जीवन माणसाच्या संयमाची परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षेत अनेकदा स्त्रीच खऱ्या अर्थाने उत्तीर्ण ठरते. मारेगाव येथील वर्दळीच्या रस्त्यावर रुग्णालयाच्या दारात फळांची टोपली मांडून संसार सावरणाऱ्या शांताबाई दशरथ गदाई (वय ५०) यांची कहाणी म्हणजे संघर्ष, त्याग आणि मायशक्तीचा जिवंत आदर्श आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताने गदाई कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी दिली. पती दशरथ गदाई यांच्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी लागणारा खर्च प्रचंड होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने “उपचार कसे करायचे?” हा प्रश्न उभा ठाकला. निराशेच्या गर्तेत दशरथ यांची जगण्याची आशाच मावळू लागली होती.

याच काळात शांताबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. तीन मुलांची माय, दोन मुलींची जबाबदारी पेलणारी पत्नी संकटापुढे डगमगली नाही. उसनवारी करून वणी, यवतमाळ, सावंगी (मेघे) येथे पतीवर उपचार सुरू ठेवले. मदतीचे हात कमी झाले, पण शांताबाईंच्या हातातील फळांची टोपली कधीच खाली पडली नाही.

मुंबईतील मोठ्या रुग्णालयात संसाराची खरी लढाई सुरू झाली. उधारीवर आणलेली फळे, रुग्णालयाच्या पायरीवर थाटलेला छोटासा व्यवसाय आणि दिवसाकाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून उपचारांचा खर्च भागवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. सकाळी वडापाव आणि संध्याकाळी कोरडी भाकरी—इतक्याच आधारावर संसाराचा गाडा पुढे ढकलला जात होता.

प्रत्येक विकलेले फळ म्हणजे पतीच्या आयुष्यात भरलेला एक नवा श्वास होता.नागपूर येथे अखेर डॉक्टरांनी कठोर निर्णय सांगितला—प्राण वाचवायचा असेल तर हात कापावा लागेल. डोळ्यात अश्रू असूनही शांताबाईंनी हा निर्णय स्वीकारला. “हात जाईल, पण जीव राहील,” या विश्वासावर पुन्हा उसनवारी करून पतीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरही रुग्णालयाच्या दारात फळविक्री थांबवली नाही.

आज दशरथ गदाई एका हाताने दिव्यांग असले तरी शांताबाईंच्या जिद्दीमुळे त्यांच्या कपाळावरील कुंकू अबाधित आहे. औपचारिक शिक्षण नसले तरी आयुष्याच्या शाळेतून शिकलेली ही स्त्री आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. तिने केवळ संसार वाचवला नाही, तर आपल्या मुलांना कष्ट, माणुसकी आणि संघर्षाचे संस्कारही दिले.

राजमाता जिजाऊंनी संघर्षातून शिवराय घडविले;
शांताबाईंनी संघर्षातून कुटुंब घडविले.
म्हणूनच रुग्णालयाच्या दारातली ती फळांची टोपली केवळ उपजीविकेचे साधन नसून संघर्ष, माया आणि न संपणाऱ्या धैर्याची पताका आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!