मारेगाव तालुक्यात मे महिन्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. मे महिन्याच्या कडक उन्हातही शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात राबताना दिसत असून नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती, शेतसाफसफाई आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे नांगरणीची कामे सुरू असून बैलजोडीच्या साहाय्यानेही पारंपरिक पद्धतीने शेती मशागतीची कामे केली जात आहेत.
खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकरी शेताची पूर्वतयारी करण्यात व्यस्त झाले आहेत.यावर्षी वेळेत पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी बियाणे, खते व शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करत आहेत. काही ठिकाणी शेततळ्यांची साफसफाई, तर काही भागात बांधबंदिस्तीची कामेही सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या शेतीकामांची लगबग पाहायला मिळत आहे.
मे महिन्याच्या प्रखर उन्हातही शेतकरी घाम गाळून आगामी हंगामासाठी मेहनत घेत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. “शेतात मेहनत केली तरच पावसाळ्यात चांगले उत्पादन मिळते,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशा आणि नव्या उमेदीने शेतात उतरल्याने तालुक्यातील वातावरण कृषिमय झाले आहे.
