“आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला… आमचा देवच गेला!” अशा शब्दांत काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहो आणि समर्थकांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर, अशा अत्यंत हृदयद्रावक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव बारामतीहून त्यांच्या मूळ गावी, काटेवाडीत आणण्यात आले, तेव्हा संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता… ओ साहेब, थांबा ना, आमच्या दादांना असे नेऊ नका, तुमच्या पाया पडतो! हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द होते काटेवाडीतील त्या कार्यकर्त्यांचे, जे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अक्षरशः रुग्णवाहिकेसमोर आडवे होत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव जेव्हा काटेवाडीतील निवासस्थानावरून विद्या प्रतिष्ठानकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसागराचा संयमाचा बांध फुटला.
अजित पवार यांचे पार्थिव सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आणण्यात आले. दादांना आपल्या गावच्या मातीची आणि इथल्या माणसांची प्रचंड ओढ होती; सण-उत्सव ते नेहमी इथेच साजरे करायचे. त्यामुळेच, आज जेव्हा त्यांचे पार्थिव घराबाहेर आले, तेव्हा लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली. ही गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. दादांना नेऊ नकाकाटेवाडीतील दर्शन आटोपल्यानंतर जेव्हा पार्थिव रुग्णवाहिकेत चढवण्यात आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. दादांना नेऊ नका अशी विनवणी करत कार्यकर्ते आणि ग्रामस्थ ओक्साबोक्शी रडत होते. काहींनी तर रुग्णवाहिकेलाच मिठी मारून आपल्या नेत्याला रोखून धरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. रोहित पवार गेटवर चढले रोहित पवारांनी सावरली परिस्थिती गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांना स्वतः बंगल्याच्या गेटवर चढावे लागले. त्यांनी दोन्ही हात जोडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी रांगा लावून एक-एक करून नागरिकांना दर्शनासाठी आत सोडले.
आमच्या वाघाला सलाम
अजितदादांना निरोप देताना काटेवाडीतील महिलांची अवस्था बघवत नव्हती. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता, आज आम्ही बहिणी आमच्या या वाघाला सलाम करतो, असे बोलताना या महिलांच्या हुंदक्यांनी उपस्थितांची मने हेलावली. ज्या नेत्यावर आजवर हक्काने रागवलं, ज्यांच्याकडे हक्काने कामं मागितली, तो ‘दादा’ आज कायमचा शांत झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.
दादा गेले विश्वास बसत नाही, काटेवाडीतील महिलांनी व्यक्त केल्या भावना “दादा गेले, यावर विश्वासच बसत नाही…” काटेवाडीतील फार्म हाऊसवर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना, तेथील महिलांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, राष्ट्रवादीचे दोन गट झाले, पण आम्हाला कधीच त्याची जाणीव झाली नाही, कारण दादा आमच्यासाठी नेहमीच उभे होते. पण आज दादांचा मृत्यू झाला, यावर आमचा विश्वासच बसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही दादांशी असलेले लोकांचे नाते तुटले नव्हते, याची प्रचिती आजच्या गर्दीवरून येत होती. अजित पवारांचे पार्थिव जेव्हा फार्म हाऊसवरून बारामतीकडे अंत्यसंस्कारासाठी निघाले, तेव्हा रस्ते अपुरे पडतील इतकी गर्दी त्यांच्या मागे दिसून आली.
