पर्यावरणासाठी वृक्षलागवडीसह संवर्धन आवश्यक:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन‎

हवामान बदलाच्या आव्हानात्मक कालखंडात, यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या उच्चांकाने जनतेच्या मनात वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भवितव्यासाठी पर्यावरण संवर्धन ही आजची प्राथमिक गरज बनली असून, केवळ वृक्षलागवड करून न थांबता योग्य संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण विभागाच्या वतीने त्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विशेषतः गावपातळीवर घरोघरी फळझाडांची लागवड केल्यास निसर्ग संरक्षणासोबतच आरोग्यदायी फळे सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक आणि शारीरिक हित जोपासता येईल. विदर्भ प्रांतासाठी उपयुक्त सर्व प्रकारच्या फळझाडांची रोपे व कलमे विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध असून, विदर्भवासीयांनी याचा लाभ घेऊन आपली निसर्ग संवर्धनाची कटिबद्धता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. वर्षा टापरे, डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. राजेंद्र ईसाळ, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. गोविंद जाधव आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे उपस्थित होते. आत्मनिर्भर कृषी व अकोल्याचे वैभव ‘शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी’ या संकल्पनेने सेवारत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी कालसुसंगत पीक वाण, शेती उपयोगी यंत्रे आणि तंत्रज्ञान शिफारसी देऊन आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी प्रक्षेत्रावरील नानाविध वनसंपदा तसेच पशुपक्षी संपदा राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरत असून, हे कृषी विद्यापीठ शहरासाठी एक मोठे वैभव आहे, असा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!