समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर परिणाम दिसतो, असे वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पेडणेकर यांनी या प्रकरणावर लगेच सारवासारव केली. तसेच आपल्या वक्तव्याने कुणाची मने दुखली असतील, तर माफी मागते, असे सांगितले. ‘एमआयएम’चा आक्षेप मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, या उद्देशाने आता समर्थ रामदास स्वामी रचित ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव समोर येताच एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. धर्माची शिकवणी नको एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उबाळे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे, तिथे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या शिकवणीची सक्ती करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये धर्माधारित शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य आणि त्यातील कर्तव्यांचे शिक्षण द्यायला हवे. एमआयएमने विरोध केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी एकदम माघार घेतली आहे. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? एमआयएमने विरोध केल्यानंतर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मनाचे श्लोकाला कुणीतरी विरोध केला असे मला समजले. त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपण जर आपण पाहिले त्यांच्या मनावर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहले आहेत. मनपाच्या अनेक शाळा आहेत, त्यांचे लाखात विद्यार्थी आहेत जर असे असतील तर त्यांच्या मनावरती खऱ्या अर्थाने सर्व जाती-धर्म पंथाच्या लहान मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मनाचे श्लोक फक्त हिंदूचे आहेत असे म्हणू नये. अशी जोडणी पुन्हा करणार नाही- पेडणेकर किशोरी पेडणेकर यांच्या या वक्तव्यानंतर टीकेची एकच झोड उठली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ‘मी अशी जोडणी पुन्हा करणार नाही. त्या माध्यमातून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते. पण माझा उद्देश होता. कोणत्याही जाती पंथाचा नागरिक चांगला घडावा आणि आपल्या देशाच्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार त्याला कळेल असे म्हणायचे होते. पण यापुढे अशी जोडणी होणार नाही.’ काय आहेत मनाचे श्लोक? समर्थ रामदास स्वामी यांनी यांनी मनाचे श्लोक लिहिले आहे. या पद्यातील श्लोकांची संख्या 205 आहे. त्यांची रजना भुजंगप्रयात वृत्तात केली असून, प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षरे आहेत. हे श्लोक सकाळच्या तसेच सायंकाळच्या प्रार्थनेत म्हणले जातात. भोजनाच्या प्रारंभी आणि संप्रदायातील शिष्य हे भिक्षा मागतानाही हे श्लोक म्हणतात. संस्कार व सुविचार यांचा उत्तम मेळ या श्लोक झालेला दिसतो. श्लोकातून समर्थ रामदास स्वामींनी सदाचाराची शिकवण दिली आहे. ईश्वरभक्ती, नैतिकता, जीवनदर्शन, मनशांती असे अनेक विषयांवर त्यांनी या श्लोकातून अतिशय मौलिक मार्गदर्शन केले आहे.
