राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्या विचारांचे स्थान सर्वोच्च होते, तोच ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या विचारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटणला आहे. त्यांनी आज सकाळी १० वाजता कराडच्या प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत, अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.
यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रीतिसंगमावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कराडचे प्रीतीसंगम आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा नेहमीच प्रेरणास्थान राहिली. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या काळात अजितदादांनी नेहमीच या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली होती. आपल्या भाषणांमधूनही ते ‘चव्हाणसाहेबांची विचारसरणी’ हाच आपला आधार असल्याचे सांगायचे. आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीतीसंगमावरून करून, आपण दादांचा हा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्यास सज्ज आहोत, असाच संदेश दिला आहे. विदीप जाधव यांच्या कुटुंबाची घेतली भेट २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा शब्द देत त्यांनी जाधव कुटुंबीयांना आधार दिला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथविधीनंतरचा त्यांचा हा पहिलाच सातारा दौरा असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
