शहरातील ‘यशोधन’ इमारतीसमोरील ‘टॉप टेन इम्पेरियल’ या व्यापारी संकुलात प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपच्या स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावित दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन िदले. उत्पादनशुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या जागेवर हे वाईन शॉप आणण्याचे नियोजन सुरू आहे, ते एक मोठे व्यापारी संकुल आहे. या परिसरात दिवसभर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या आणि उच्चभ्रू भागात दारूचे दुकान सुरू झाल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन व्यावसायिक वातावरणावर विपरित परिणाम होईल. या संकुलात आणि परिसरात महिलांच्या मालकीच्या अनेक व्यावसायिक आस्थापना आहेत. वाईन शॉप सुरू झाल्यास तळीरामांमुळे वाहतूक कोंडी, पार्किंगच्या समस्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दारुड्यांमुळे छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची चिंता स्थानिक महिलांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांसमोर बोलून दाखवली. “दारूमुळे आधीच अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यामुळे नवीन दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी भूमिका महिलांनी मांडली. आमदार अमोल खताळ आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या वाईन शॉपला येथे परवानगी मिळू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी अमर कतारी, आसिफ तांबोळी, शहरप्रमुख फैसल सय्यद, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, श्रीकांत खिची, लोक कतारी, शुभम काळे, आरती मसराम, लक्ष्मी खिची, रोशन गायकवाड, साधना शिवलकर, सुगरिता खिची, मोहिनी कतारी आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार व्यापाऱ्यांनी यापूर्वीच एकमताने ठराव करून अशा प्रकारच्या मद्य व्यवसायाला या परिसरात बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या आणि महिलांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित वाईन शॉपच्या स्थलांतराची परवानगी तात्काळ फेटाळावी; अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
