बातमी ऐका (Marathi Voice Reader)
जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा पारा चढाच राहिला आहे. यंदा जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत अनेक भागांत, विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती कायम आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिरा दाखल झाला होता. परिणामी १ ते १३ जून दरम्यान विदर्भाचे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पहिल्या दोन आठवड्यांत कडक ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे (लू) नागरिक हैराण झाले होते. अजून दोन दिवस परिणाम जाणवतील. उन्ह चांगलेच तापत असल्यामुळे नागरिकांना जून महिन्यातही कान आणि डोके झाकूनच दैनंदिन कामे करावी लागत आहे. पुढील काही दिवस लाट अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट (हीटवेव्ह) जाणवू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनो व इंडियन ओशन डायपोल (आयओडी) या हवामान घटकांचा मान्सूनवर परिणाम होत असून यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.