Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ठाकरे अन् शिंदे गट एकत्र येणार का?:राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मोठ्या घडामोडींचे संकेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला मुंबईत ठाकरे गटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राजकारणात काहीही होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेत 2022 मध्ये उभी फूट पडली. बहुतांश आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या मागे उभे राहत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. त्यानंतर शिवसेना मूळ पक्षही त्यांच्या गटाला मिळाला. तेव्हापासून या दोन्ही पक्षांत विस्तवही आडवा जात नाही. पण आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटापुढे मुंबईत शिवसेनेचा महापौर देण्यासाठी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे सूचक विधान केले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते गुलाबराव पाटील याविषयी बोलताना म्हणाले, आता दोन्ही भाऊ (राज व उद्धव ठाकरे) एकत्र आलेत. प्रत्येकाचा एक विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. कोण कधी कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. आता आपण एमआयएमची कुणासोबत युती आहे हे पाहत आहोत. त्यामुळे कुणी कुणासोबतही जाऊ शकते. या प्रकरणी कुणीही काहीही कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र येतील का? तर राजकारणात काहीही होऊ शकते. हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडावा अशी सध्या स्थिती गुलाबरावांनी यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे गट व मनसेच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, राज ठाकरे यांची भूमिका लवचिक व टणक आहे. प्रत्येकाला वेगवेगळी भूमिका घेता येते. पण ती कधी घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मीरा भाईंदरमध्ये शिवेसना व काँग्रेस एकत्र आले. आता काहीही होत आहे. अंबरनाथमध्ये 11 नगरसेवक आज आले. हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडावा अशी परिस्थिती आहे, असे गुलाबराव या प्रकरणी बोलताना म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते भास्कर जाधव? भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदेंनी 100 टक्के उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे. तो घेणे न घेणे वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी तो दिला पाहिजे हे मी सांगतो. त्यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये. बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांमुळे आम्ही इथे आलो असे तुम्ही सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अधिकार, अहंकार, मान, अपमान बाजूला सारला पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. महापौर निवडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे. ते बाळासाहेबांना मानत असतील तर त्यांना ते दातृत्व दाखवावे लागेल, असे भास्कर जाधव म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!