विविध मुद्यांवर वादळी चर्चा
सुरेश पाचभाई / मारेगाव
मारेगाव पंचायत समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक आमसभा तथा सरपंच परिषद आयोजित करण्यात आली होती. बदकी भवन येथे पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उत्तमराव निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, माजी पंचायत समिती सभापती शीतलताई पोटे, वनोजा देवी (ता. मारेगाव) येथील सरपंच डिमनताई टोंगे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष वसंतराव आसुटकर, भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, देवा बोबडे, अजय कवरासे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सभेत पाणीटंचाई, घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्धतेचा प्रश्न तसेच विविध विभागांच्या प्रलंबित कामांवर सरपंच व सदस्यांनी तीव्र प्रश्न उपस्थित केले. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांतील कामे अर्धवट असल्याचा मुद्दा यावेळी ऐरणीवर आला. यासंदर्भात संबंधित विभागाचे प्रतिनिधी गोरख यांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिली.
घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीविषयक प्रश्नावर तहसीलदार उत्तम निलावाड यांनी समाधानकारक भूमिका मांडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाव झालेल्या आपटी रेती डेपोमधून १० टक्के रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच चिंचाळा, बोरी (बु.), खैरगाव, दापोरा या नाल्यांमधूनही रेती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
मोफत रेती वाटप धोरण असले तरी रेती भराई व वाहतूक खर्च लाभार्थ्यांना परवडत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, ट्रॅक्टर मालक व रेती भराई करणाऱ्या मजुरांची तातडीची बैठक घेऊन माफक दरात घरापर्यंत रेती पुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदार निलावाड यांनी दिली. येत्या आठवड्याभरात रेती वाटप सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभेस अनुपस्थित राहिलेल्या भूमी अभिलेख विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी व्ही. एन. जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग.वी.अ. भिमराव व्हनखंडे यांनी केले.आभार प्रदर्शन धीरज साळुंखे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज निमसटकर, श्रीराम आगलावे, सागर कुकुटकर, अनिल राऊत, मंगेश पांगारकर, प्रमोद देठे, विलास बल्की यांच्यासह पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
