सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: ग्रामीण भागातील शिक्षण टिकावे, गरीब-कष्टकरी शेतकरी पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून रंगरंगोटी करून नवसंजीवनी देण्यात आली आहे.
वेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या पुढाकाराने गावातून लोकवर्गणी गोळा करून नुकतीच शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे; ते स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असणे तितकेच महत्त्वाचे आहे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील शाळा बंद पडू नयेत, विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड सुरू राहावे यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. वेगावच्या शाळेत अनुभवी, उच्चशिक्षित व विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारा शिक्षकवर्ग, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग यामुळे आजही या शाळेची पटसंख्या समाधानकारक आहे.

लोकवर्गणी गोळा करताना आजही गावकऱ्यांच्या मनात शाळेबद्दल असलेला आदर व जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. आधुनिक युगाची गरज ओळखून आदर्श गाव समितीतर्फे शाळेसाठी स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थी आता तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
यावेळी गावातील पालकांना आवाहन करण्यात आले की, केवळ इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाला बळी न पडता, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान जपण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश गावातील जिल्हा परिषद शाळेतच घ्यावेत.
आपण शिकलेली शाळा टिकावी, ती अधिक सक्षम व्हावी यासाठी सर्व सजग पालकांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गौरकार , मुख्याध्यापक श्री देवगडकर सर तसेच शाळा. व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी केली आहे.लोकसहभाग, शिक्षकांचे समर्पण आणि गावकऱ्यांचा विश्वास यामुळे वेगावची जिल्हा परिषद शाळा आजही ग्रामीण शिक्षणाचा आदर्श ठरत आहे.
