मुंबई महानगरपालिकेतील विविध वैधानिक समित्यांच्या निवडीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीत स्थान न देण्याचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेत्या असतानाही त्यांचे नाव समितीच्या यादीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत. सोमवारी महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. नियमानुसार विरोधी पक्षनेता हा पदसिद्ध सदस्य म्हणून स्थायी समितीत जातो. मात्र ठाकरे गटाने महापौरांकडे सादर केलेल्या नावांच्या यादीत किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत स्थान मिळाले नाही, अशी अभूतपूर्व घटना घडली आहे. या घडामोडींवरून भाजप नेते संतोष धुरी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत हा निर्णय अज्ञानातून घेतला की नियोजनबद्ध डाव आहे, असा सवाल उपस्थित केला. हा मातोश्रीचा आराखडा आहे की प्रशासकीय अज्ञान, हे आता स्पष्ट झाले आहे, असे म्हणत त्यांनी उपरोधिक भाषेत ठाकरे यांचे अभिनंदन केले. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांना समित्यांपासून दूर ठेवण्याची सुरुवात झाली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. धुरी यांनी पुढे म्हटले की, विरोधी पक्षनेता आपोआप स्थायी समितीत जातो, हा नियमच ठाकरे गटाला माहीत नव्हता का? मातोश्रीवरून नाव देऊ नका, असा संदेश गेला आणि तो मान्य करण्यात आला, असे ते म्हणाले. हा प्रकार प्रशासकीय कामकाजाच्या अज्ञानातून घडला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, हा निर्णय केवळ राजकीय चूक नसून अंतर्गत गटबाजीचेही संकेत देतो. किशोरी पेडणेकर या निर्णयामुळे नाराज असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांचा केसाने गळा कापला गेला, असे वक्तव्य करत त्यांनी या घडामोडींना तीव्र शब्दांत वर्णन केले. सभागृहापुरतेच पद शिल्लक राहिले असून, समित्यांमधील प्रभाव कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रत्येक समितीवर विशिष्ट व्यक्तींच्या प्रभावामुळे संधी मिळत होती; मात्र आता इतर वरिष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात आल्याने हा निर्णय घेतला गेला असावा, असेही धुरी म्हणाले. पक्षातील त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणाचीही चर्चा सुरू झाली आहे. गटनेत्या असूनही पेडणेकर यांना कोणत्याही समितीत स्थान न मिळाल्याने पक्षातील त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षनेत्याचे नाव स्थायी समितीत नसणे ही घटना पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याने तिचे राजकीय परिणाम दूरगामी ठरू शकतात. हा बदल राजकीय संदेश देणारा या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे आणि ठाकरे गटातील निर्णयप्रक्रिया चर्चेत आली आहे. समित्यांच्या निवडीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत झालेला हा बदल साधा प्रशासकीय प्रकार नसून राजकीय संदेश देणारा आहे, असे जाणकारांचे मत आहे. पुढील काळात किशोरी पेडणेकर यांची भूमिका काय असेल आणि ठाकरे गट या वादावर कशी भूमिका स्पष्ट करेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
