डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु, टीव्ही, संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम आले तसे मुलेही मैदानापासून दूर झाली. आधुनिक युगात मानवी जीवनशैलीत अनेक बदल होत आहेत. अलीकडे, मैदानी खेळांचे आकर्षण कमी होत आहे. पूर्वी गल्लीत पळापळीची शर्यत होत असे. आता त्याची जागा शालेय जीवनातील धावण्याच्या स्पर्धेतील सहभागापुरती मर्यादित राहिली आहे. गेल्या काही वर्षापूर्वीचे मुला-मुलींचे गल्लीबोळातील आणि मैदानावरील अनेक पारंपरिक खेळ आता नामशेष झाले असून, बहुतांश मुले तासन् तास मोबाइलमध्ये व्यस्त दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास खुंटला आहे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला. सर्व मैदानी खेळ विसरून केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर दिला जात आहे. पूर्वी खेळण्यासाठी मोठमोठी मैदाने उपलब्ध होती. त्यामुळे खेळण्यासाठी जागा शोधण्याची गरजच नव्हती. मात्र, आता तशी स्थिती राहिली नाही. या युगात मैदानासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे खेळायचे कुठे? हा देखील मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, मैदानांवर सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिलेले दिसत आहे. पूर्वी शाळा सुटली की, धावत-पळत घरी जाऊन अनेक मित्रमैत्रिणी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीचे मैदानी खेळ मोठ्या उत्साहात खेळत असत. याची जागा आता तासन् तास घरात बसून संगणकीय गेम आणि मोबाइलवरील खेळांनी घेतली आहे. जुने पारंपरिक विविध प्रकारचे मैदानी खेळ लोप पावत आहेत. सध्या गल्लीबोळात एकमेव आणि परदेशी खेळ क्रिकेट हाच काय तो शारीरिक व्यायामाचा खेळ रंगताना दिसत आहे.रेस टीप, विटी दांडू, भोवरे, लगोरी हे खेळ कालौघात फारच मागे पडले आहेत.पूर्वी गल्लीबोळात पळापळीच्या आणि पकडापकडीच्या उत्स्फूर्त शर्यती आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. धावण्याच्या या स्पर्धा आता केवळ शाळेतील क्रीडा महोत्सवातील सहभागापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. बहुतांश मुले तासन् तास मोबाईल स्क्रीनमध्ये व्यस्त असल्याने त्यांचे शारीरिक श्रम पूर्णपणे थांबले आहेत. स्मार्टफोनचा वाढता वापर आणि मैदानांची कमतरता यांमुळे आजची पिढी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहे. रेस टिप, लाकडी भोवरे, विटी दांडू हे खेळ हरपले लहान मुलांचा आवडता खेळ म्हणजे डंकी-पिंकी व्हॉट कलर. रेस टीप, विष की अमृत, लाकडी भोवरे हे खेळही आता खेळले जात नाहीत. सायकलचे बिनकामी टायर आता रस्त्याने फिरविले जात नाहीत. आट्या-पाट्या, गोठ्या, तळ्यात मळ्यात, टोच- पाच, राजा-राणी, चोर- पोलिस, बैंडबा- गोळी, टिंबू- लंगडी, विटी- दांडू खेळणाऱ्यांचे प्रमाणही नगण्य आहे. देशी खेळांमध्ये कबड्डी, खो-खो अजुनही तग धरून कबड्डी व खो-खो हे देशातील पारंपरिक मातीतील खेळ अजुनही तग धरून आहेत. दोन्ही खेळांसाठी फारसे साहित्य लागत नाही.त्यामुळे जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत दोन्ही खेळांमध्ये विक्रमी २०० ते ३०० संघ सहभागी होतात. एव्हाना दोन्ही खेळांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वरूप बदलले आहे. प्रो-कबड्डीमुळे कबड्डीला चांगले दिवस आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ चांगलाच लोकप्रियही झाला आहे. हा खेळ आता मॅटवर खेळला जातो. त्या तुलनेत खो-खो हा मात्र काहीसा मागे पडला असला तरी हा खेळही राट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!