सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कथित क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या पूर्णपणे खोट्या असून त्या राजकीय हेतूने माध्यमांमध्ये पेरल्या गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत काही नेते सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर त्यांनी सडकून टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणताही अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नसताना क्लीन चीटची बातमी कशी काय प्रसिद्ध होते? खारगे समितीला असा निकाल देण्याचा अधिकारच नाही, असे त्या म्हणाल्या. ही माहिती संबंधित गटाकडूनच जाणीवपूर्वक बाहेर सोडली गेली असावी, असा त्यांचा आरोप आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी त्यांची प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवरही दमानिया यांनी भाष्य केले. पक्षात सध्या मोठी घाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, उरलेले नेते म्हणजे सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असून पक्षाची सर्व सूत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. दमानिया यांनी प्रशासकीय कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल येथे नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज त्यांना यासंबंधी व्हिडिओ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि नाईक यांच्या नवी मुंबईत असे प्रकार जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्ही आर एस कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही, असेही त्या म्हणाल्या. याच वेळी त्यांनी विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्सच्या माहितीकडे लक्ष वेधले. ब्लॅक बॉक्समधील माहिती का पुनर्प्राप्त होत नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनातील ढिसाळपणा आणि राजकीय हस्तक्षेपामुळेच अहवाल बाहेर येण्यास विलंब होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. दमानिया यांनी कुटुंबीय भूमिकेवरही भाष्य केले. सुनेत्रा पवार जर झिरवळ यांच्यावर नाराज असतील, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला वाचवले जाते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंत्रालयात प्रत्येक कामासाठी दर ठरलेले असल्याचा आरोप करत त्यांनी विविध ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतले जात असल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले मी स्वतः मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवून या प्रकरणाचा अधिकृत अहवाल मागितला आहे, असे दमानिया यांनी सांगितले. जोपर्यंत अधिकृत कागदपत्र समोर येत नाही, तोपर्यंत अशा बातम्या देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. राजकीय दबावामुळे अहवाल दडपला जातो, जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात झाले होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून पुढील काही दिवसांत या वादाला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.
